मन गंगेच्या काठावर
मन गंगेच्या काठावर हे पुस्तक पूर्वोत्तर भारतातील ज्येष्ठ आणि पहिल्या महिला पत्रकार असणाऱ्या श्रीमती सबिता गोस्वामी लिखित मनो गोंगार तिरोत ह्या मूळ आसामी भाषेत लिहलेल्या आत्मचरित्राचा श्रीमती सविता दामले यांनी मराठी भाषेत केलेला अनुवाद .
आसाम आणि पूर्वोत्तर भारतातील राजकारण ,जनतेच्या दिल्लीश्र्वराकडून अपेक्षा आणि आसामच्या नी पूर्वोत्तर भारतातील जनतेच्या भावनांची , अपेक्षांची कमी अधिक प्रमाणात दिल्लीश्र्वराकडून झालेली हेळसांड आणि त्यातून तेथील जनतेच्या मनात निर्माण झालेली दुरावल्याची भावना अर्थात त्याला केंद्रीय सत्ताधाऱ्यांची ध्येय धोरणे आणि देशाच्या त्या भागाबद्दल असणारी अनास्था देखील तेथे निर्माण झालेल्या असंतोषस कारणीभूत होती.
वानगीदाखल उदाहरण द्यायचेच झाले तर स्वातंत्र्य मिळताना स्वातंत्र्य आपणास तुकड्यात मिळाले भारताची फाळणी होऊन दोन देश निर्माण करण्यात आले भारत नी पाकिस्तान स्वातंत्र्याच्या वेळी आजचा बांगलादेश असणारे राष्ट्र हे पूर्व पाकिस्तान होते आणि फाळणीच्या वेळी आजचा आसाम हा पाकिस्तानात समाविष्ट करण्याची तयारी देखील तत्कालीन नेत्यांनी चालवली होती परंतु आसामचे प्रथम मुख्यमंत्री गांधीवादाचे पुरस्कर्ते ,भारतरत्न लोकप्रिय गोपीनाथ बारदोलाई यांच्या प्रयत्नामुळे आसाम हे राज्य आजच्या भारतीय संघराज्याच्या सीमेत समाविष्ट झाले ,दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर १९६२ च्या चिनी आक्रमणात चीनचे सैन्य तेजपुर पर्यंत येऊन ठेपले होते आणि त्यावेळी नेहरूंनी त्याच्या प्रतिसादात केलेल्या भाषणात My Heart Goes with People of Assam ह्या वाक्य मुळे आसामच्या जनतेच्या मनात जी न बरी होणारी जखम झाली ती कायम ठस ठसत राहिली.
नंतर पूर्व पाकिस्तानात पश्चिम पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी केलेल्या अत्याचारामुळे हजारो तत्कालीन पाकिस्तानी (बांगला) नागरिकाच्या झालेल्या स्थलांतरामुळे आसाम मध्ये बिघडलेला सामाजिक आणि आर्थिक समतोल हा कायम एक विवादास्पद मुद्दा राहिला आणि त्यातून पुढे आसाम मध्ये मोठे जन आंदोलन उभे राहिले. १९७८ मध्ये आसाम मधील मंगलदोई लोकसभा मतदारसंघाच्या तत्कालीन खासदार हरीलाल पटवारी यांचे आकाली निधन झाले आणि व नवीन लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी तेथे पोटनिवडणूक लागली नी मग झाला आसाम जन आंदोलन चा जन्म , त्यात झाले असे की १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्राम युध्दामुळे मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक आसामात स्थलांतरित (घुसखोर )झाले त्यात मुख्यत बंगाली भाषिक मुस्लिम , आणि ह्या स्थलांतरांची ( घुसखोरांची ) मग नावे स्थानिक मतदार याद्या मध्ये नोंदविली गेली होती परिणाम मूळ आसामी जनतेने त्या विरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि त्यातून सुरु झाले आसूचे (ऑल आसाम स्टुडंट्स युनियन ) आंदोलन मागणी होती की विदेशी घुसखोरांची नावे मतदार याद्यातून काढल्याशिवाय आसाम मध्ये पुढील निवडणुका घेऊ नये ,पण भारतीय कोण आणि बांगलादेशी घुसखोर कोण हे ठरवायचे कसे आणि स्थलांतरित कोणत्या वर्षी भारतात आला त्याचे आधारभूत वर्षे कोणते घ्यायचे १९५१ की १९७१ यासारखे यक्ष प्रश्न होतेच परंतु आसू ची मुख्य मागणीच होती ह्या सर्व घुसखोरांना आसाम बाहेर घालवल्याशिवाय निवडणुकांचं घेऊ नये सकृतदर्शनी हे आंदोलन विद्यार्थ्यांनी गांधीजी च्या विचारसरणी नुसार शांततेच्या मार्गाने चालवलेले आंदोलन होते पण जसा जसा काळ पुढे जात गेला तसे आंदोलनाला वेगवेगळ्या दिशा येत गेल्या उल्फा (युनाइटेड लिब्रेशन फ्रंट ऑफ आसाम ) चा जन्म झाला उल्फा ही अतिरेकी संघटनाच होती . बोडोलँड ची मागणी ,उदयाचल ची मागणी ,आसूंचे रूपांतर आसाम गणो परिषद या पक्षात झालेले रूपांतर आणि स्वतंत्र्य भारताच्या इतिहासात कधी न घडलेली घटना म्हणजे महाविद्यालयाच्या वसतिगृहातून विध्यार्थी सरळ राज्याच्या मंत्रीपदी , मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. श्री .प्रफुल्ल महंतो हे वयाच्या ३३ व्या वर्षी देशातील कोणत्याही संपूर्ण राज्याचे (केंद्रशासित प्रदेशाबाबत वेगळे रेकॉर्ड आहे ) सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. या आणि बऱ्याच राजकीय घडामोडीचा लेखिकेने बिबीसी (ब्रिटिश ब्रॉडकॉस्टिंग कॉर्पोरेशन ),ब्लिटीझ या सारख्या प्रथितयश माध्यमाच्या प्रतिनिधी म्ह्णून मागोवा घेतला या आंदोलनाची दुसरी बाजूही जगासमोर आणणाऱ्या बातम्या दिल्या त्यात नेल्लि येथील नृशंस हत्याकांड स्टुडंट्स टर्न राज्याचे मंत्री मुख्यमंत्री झालेल्या नेत्यांचे वागणे,१९८५ च्या आसाम करारांचे पुढे काय झाले ,खरोखरच आसाम घुसखोर मुक्त झाला का यासारख्या बऱ्याच गोष्टीची या पुस्तकातून माहिती मिळते .
ज्याप्रमाणे ब्रम्हपुत्रेतील माजुली बेटे ब्रम्हपुत्रेच्या प्रवाहाचे दोन प्रवाहात करतात त्याच प्रमाणे लेखिकेचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य हे देखील दोन वेगळे प्रवाहच जरी लेखिका आणि त्यांचे यजमान यांचा प्रेम विवाह होता तरी देखील त्यांना संसार करण्यासाठी ,मुलीच्या शिक्षणासाठी बराच संघर्ष करावा लागला, कारण त्यांचे यजमान दुभंगलेली मनोस्थितिने (स्चीझोफ्रेनियाने ) ग्रस्त होते.हा सर्व विरोधाभास असून देखील लेखिकेने कश्या प्रकारे ह्या सर्व गोष्टी चा सामना केला त्यांच्या एक शिक्षिका ते पूर्वोत्तर भारतातील आंतरराष्ट्रीय माध्यमाचे प्रथम महिला पत्रकार या पर्यंतचा प्रवास म्हणजेच मन गंगेच्या काठावर .
पुस्तक कोणी वाचावे
१. ज्यांना एन आर सी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन ),कॅब (सिटीझन शिप अमेंडमेंट बिल) ,सी ए ए (सिटीझन शिप अमेंडमेंट ऍक्ट ) चे मूळ काय आहे हे आणि त्याची आसामात का सुरवात झालीहे जाणून घ्यायचे आहे त्यांनी
२. बांगलादेशी घुसखोरीची समस्या काय आहे आणि तिचे आसाम शी नाते काय
३.बोडोलँड ची मागणी काय आहे
४.आणि व्यक्तिगत आयुष्यात हरलेल्याची भावना मनात निर्माण झालेली आहे अश्या सर्वानी
हे पुस्तक जरूर वाचावे.
Rajhans Prakashan
#RajhansPrakashan
No comments:
Post a Comment