Monday, September 28, 2020

सुसाट जॉर्ज


 सुसाट जॉर्ज


सुसाट जॉर्ज हे निळू दामले लिखित ख्रिस्तवासी जॉर्ज फर्नांडिस यांचे एक प्रोफाईल आहे. तसे आजपर्यंत निळू दामले यांनी लिहलेले हे दुसरे पुस्तक वाचून संपवले. माझ्या मते प्रत्येक चरित्रात्मक,आत्मचरित्रात्मक वाचन करणाऱ्या वाचकाच्या मनात बरेच व्यक्तिमत्व हे सदैव रुंझी घालत आणि त्या व्यक्तिमत्वाविषयी पुस्तके वाचनास साद घालत असतात . तसे मला देखील विविध क्षेत्रात काम केलेले आणि करणारे असे व्यक्तिमत्व सदैव त्यांच्या विषयी वाचण्यासाठी प्रवृत्त करतात . 

अगदी स्वातंत्र्य पूर्व नी स्वातंत्रोत्तर भारतीय औद्योगिकरणाच्या इतिहासात आणि संपूर्ण भारतभर विविध कामगार संघटनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या नी  इतिहास घडवणाऱ्या कामगार चळवळीचे अर्ध्वयू मानले जाणारे नेते घडवण्यात महाराष्ट्राचा व  मुंबई शहराच्या सिंहाचा वाटा आहे . अगदी नारायण मेघाजी लोखंडे पासून , कॉ. डांगे सारखे कट्टर डावे ,डॉक्टरी व्यवसायातून कामगार नेते झालेले डॉ दत्ता सामंत ,भारतीय मजदूर संघाचे दत्तो पंत ठेंगडी ,मुक्त कामगार चळवळीचे प्रणेते नी भांडवलवादी  अर्थव्यवस्थेचे समर्थक असणारे आर जे मेहता , भारतीय कामगार सेनेचे वामनराव महाडिक , दत्ताजी साळवी,विडी कामगारांचे नेते आडम  मास्तर ,सिटू चे कॉ गोविंद पानसरे ,कॉ.  बी टी रणदिवे ,कॉ बगाराम तुळपुळे ,हिंद मजदुर सभेचे शरद राव ह्या सर्व कामगार नेत्यांच्यात एक महत्वाचे नी ज्याचे नाव घेतल्याशिवाय किंबहुना मुंबईचाच नव्हे तर उभ्या भारताच्या कामगार चळवळीचा नी कामगार नेत्यांचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असा  हा मुंबईचा पहिला बंद सम्राट ,जायंट किलर ,समाजवादी विचारसरणी वर नितांत श्रद्धा असणारा , भारताचे माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस.        


जॉर्ज चा जन्म आजच्या कर्नाटकातील मंगलोर (मंगळुरु) मधील एका कर्मठ ख्रिस्ती परिवारात झाला होता .जॉर्जचे वडील हे शेती बरोबर विमा व्यवसाय करत ज्या प्रमाणे सर्व वडिलांच्या आपल्या पाल्यच्या करियर बद्दल अपेक्षा असतात त्याचप्रमाणे जॉर्जच्या वडिलांना जॉर्जने वकील व्हावे असे वाटत होते पण जॉर्जला  काही वकील व्हावयाचे नव्हते त्याच्या ओढा कुठे दुसरी कडेच होता म्ह्णून जॉर्ज मॅट्रिक झाल्यावर मंगलोर मधील सेमिनारीत जाऊ लागला आणि पुढे भविष्यात त्याला बंगलोर येथील सेमिनारीत घालण्यात आले,तेथे देखील जॉर्ज स्वस्थ बसला नाही ख्रिस्ती धर्माबद्दल अखंड वाचन केले अगदी धर्माच्या सखोल ज्ञानासाठी जॉर्ज लॅटिन भाषा देखील शिकला कारण ख्रिस्ती धर्माचे मूळ तत्वज्ञान हे लॅटिन भाषेत आहे ,धार्मिक वाचनासोबत जॉर्ज चे अवांतर आणि इतर धर्माच्या तत्व ज्ञानाबद्दल ही प्रचंड वाचन आणि सखोल अभ्यास होता आणि वाचनाची जॉर्ज ची सवय अगदी अखेर पर्यंत टिकली होती . त्याच्या बंगलोर मधील खोलीत ,दिल्लीतील निवासस्थानात पुस्तकांचा प्रचंड संग्रह होता.

सुरवातीच्या काळात जॉर्ज ने चर्च वरील विश्वास उडाल्यावर स्थानिक कामगारांच्या संघटनाची बांधणी केली त्यात विडी कामगार हॉटेल मधील कामगार याच्या संघटना बांधल्या "युवक  "नावाचे कोकणी मासिक चालवलेलं त्याच दरम्यान मुंबईतून तडीपार असलेले रॉय वादी गोदी कामगारनेते पी डिमेलो हे मंगलोर येथे येऊन राहत होते . त्यांच्याशी जॉर्ज ची ओळख झाली त्या दरम्यान पी डिमेलो यांनाही त्या संघटनेत काम करण्यासाठी एका सहकाऱ्याची गरज होती व त्यांच्या दृष्टीने जॉर्ज हा योग्य सहकारी होता . त्या दोघांनी मिळून मंगलोरात बस कामगाराचा संप घडवून आणला होता . पण कालांतराने साधारणतः १९५० ला जॉर्ज मित्राच्या आग्रहाखातर नी मित्रांनी दिलेले २० रुपये घेउन मुंबईत आला व मुंबईचा झाला . 

मुंबईत स्थिरावणे नी घट्ट पाय रोवणे तसे येरा गबाळ्याचे काम नोहे परंतु जॉर्ज हा स्वभावतः निर्भय ,संघर्षशील,चिवट आणि लढाऊ होता . सुरवातीच्या काळात जॉर्ज ने बरेच कामे केलीत अगदी हॉटेलात ,संगीत रेकॉर्डच्या दुकानात ,टाइम्स मध्ये प्रूफ रीडर म्हणून विविध प्रकारची कामे केलीत .   दरम्यानच्या काळात पी डिमेलो हे  वापस मुंबईत आले व ह्या दोघांनी मिळून गोदीत  कामगाराच्या ड्रायव्हराच्या संघटना बांधल्या येेेेथे जॉर्ज अगदी हाजी मस्तान सारख्या गुंडाला देखील भिडला नी जॉर्ज ची मुंबईतील कामगार जगतात एक ब्रँड म्हणून ओळख बनायला सुरुवात झाली हळू हळू गोदी कामगार संघटना ते बेस्ट कामगार, मुंबई महानगर पालिका साफसफाई कामगाराची संघटना एक एक करत पादक्रांत करत विविध क्षेत्रातील कामगा राच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्यास सुरुवात केली , संप पुकारले . सरते शेवटी २५ जुलै १९५८ रोजी मुंबई बंद केली आणि नवाकाळ ह्या दैनिकाने बातमी करून जॉर्ज ला "बंद सम्राट" ही उपाधी बहाल केली. कामगार नेता म्हणून अगदी जे आर डी टाटा यांनी जॉर्ज ला बॉम्बे हाउस मध्ये बोलवून टाटा उद्योग समूहाच्या हॉटेल उद्योगातील कामगाराची संघटना चालवायची गळ घातली होती हे विशेष होते.

जॉर्ज चे गुरू पी डिमेलो हे निवडणुकीच्या रिंगणात हरले होते ,परंतु जॉर्ज सर्व प्रथम मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक झाला पण जॉर्ज चा पिंडच मुळी खतरों से खेलने वाला होता. त्याने १९६७ साली मुंबई प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष , खासदार, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट स का पाटील यांच्या विरुद्ध खासदारकीची निवडणूक लढविण्याचे जाहीर केले खरे तर स का पाटील यांच्या समोर जॉर्ज काहीच नव्हते .पण लोकांनी ही निवडणूक स्वतः लढवली स का पाटील हे जायंट होते तर त्यांना ह्या निवडणुकीत हरवून जॉर्ज जायंट किलर ठरला. याच सह या पुस्तकात लेखकाने जॉर्ज संबंधी त्यांचा आणीबाणी काळातील भूमिगत प्रवास ,बडोदा डायनामाईट प्रकरण , नंतर जॉर्ज चा बिहारच्या निवडणूक रिंगणात प्रवेश जनता सरकार मध्ये उद्योग मंत्री, कोको कोला , आय बी एम सारख्या कंपन्यांना देशाबाहेर घालवायचा निर्णय, रेल्वे मंत्री , काश्मीर मंत्री म्हणून कारकीर्द या संबंधी बरीच माहिती दिली आहे.

१९९६ नंतर जॉर्ज चे राजकारण कमालीचे बदलले ज्यांचा आयुष्य भर विरोध केला त्याच्याशीच युती केली त्याचं युतीचा (राष्ट्रीय विकास आघाडीचा) जॉर्ज हा समन्वयक बनला, वाजपेयी सरकार मध्ये संरक्षण मंत्री पद सांभाळलं पण २००४ नंतर जसे वाजपेयींचा करिश्मा हरवू लागला तसा जॉर्ज देखील राष्ट्रीय राजकारणातून मागे फेकला जाऊ लागला. नंतर नंतर जॉर्ज ला अल्झाईमर (स्मृतीभंश) या आजाराने ग्रासले , वाजपेयी जी पण ह्याचं आजाराने ग्रस्त होते असे म्हणतात की एके काळच्या ह्या दोघं सहकाऱ्यांना समोरासमोर आणले असते तर त्यांनी एकमेकांना ओळखलं नसते. अखेरच्या दिवसात जॉर्ज चा स्मृतीभ्रंश गडद होऊ लागला होता आणि जॉर्ज चा ताबा मिळवण्यासाठी जॉर्ज ची पत्नी लैला कबीर आणि सहकारी जया जेटली यांच्यात न्यायालयीन लढाया झाल्या जॉर्ज ताबा काही दिवस अगदी बाबा रामदेव यांच्या कडे देखील होता .

या सर्व गोष्टी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी जरूर वाचा सुसाट जॉर्ज

#RajhansPrakashan

#सुसाटजॉर्ज 

#निळूदामले

#बुकरिव्ह्यू

#जायंटकिलर

Nilu Damle

Sunday, September 13, 2020

मन गंगेच्या काठावर

 

मन गंगेच्या काठावर 

मन गंगेच्या काठावर हे पुस्तक  पूर्वोत्तर भारतातील ज्येष्ठ आणि पहिल्या महिला पत्रकार असणाऱ्या श्रीमती सबिता गोस्वामी लिखित  मनो गोंगार तिरोत ह्या मूळ आसामी भाषेत लिहलेल्या  आत्मचरित्राचा श्रीमती सविता दामले यांनी मराठी भाषेत केलेला अनुवाद  .

आसाम आणि पूर्वोत्तर भारतातील राजकारण ,जनतेच्या दिल्लीश्र्वराकडून अपेक्षा आणि आसामच्या नी पूर्वोत्तर भारतातील जनतेच्या भावनांची , अपेक्षांची कमी अधिक प्रमाणात दिल्लीश्र्वराकडून झालेली हेळसांड आणि त्यातून तेथील जनतेच्या मनात निर्माण झालेली  दुरावल्याची भावना अर्थात त्याला केंद्रीय सत्ताधाऱ्यांची ध्येय धोरणे आणि देशाच्या त्या भागाबद्दल असणारी अनास्था देखील तेथे निर्माण झालेल्या असंतोषस कारणीभूत होती.

वानगीदाखल उदाहरण द्यायचेच झाले तर स्वातंत्र्य मिळताना स्वातंत्र्य आपणास तुकड्यात मिळाले भारताची फाळणी होऊन दोन देश निर्माण करण्यात आले भारत नी पाकिस्तान  स्वातंत्र्याच्या वेळी आजचा बांगलादेश असणारे राष्ट्र हे पूर्व पाकिस्तान होते आणि फाळणीच्या वेळी आजचा आसाम हा पाकिस्तानात समाविष्ट करण्याची तयारी देखील तत्कालीन नेत्यांनी चालवली होती परंतु आसामचे प्रथम मुख्यमंत्री गांधीवादाचे पुरस्कर्ते ,भारतरत्न लोकप्रिय गोपीनाथ बारदोलाई यांच्या प्रयत्नामुळे आसाम हे राज्य आजच्या भारतीय संघराज्याच्या सीमेत समाविष्ट झाले ,दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर १९६२ च्या चिनी आक्रमणात चीनचे सैन्य तेजपुर पर्यंत येऊन ठेपले होते आणि त्यावेळी नेहरूंनी त्याच्या प्रतिसादात केलेल्या भाषणात My Heart Goes with People of Assam ह्या वाक्य मुळे आसामच्या जनतेच्या मनात जी न बरी होणारी जखम झाली ती कायम ठस ठसत राहिली.

नंतर पूर्व पाकिस्तानात पश्चिम पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी केलेल्या अत्याचारामुळे हजारो तत्कालीन पाकिस्तानी (बांगला) नागरिकाच्या झालेल्या स्थलांतरामुळे आसाम मध्ये बिघडलेला सामाजिक आणि आर्थिक समतोल हा कायम एक विवादास्पद मुद्दा राहिला आणि त्यातून पुढे आसाम मध्ये मोठे जन आंदोलन उभे राहिले. १९७८ मध्ये आसाम मधील मंगलदोई लोकसभा मतदारसंघाच्या तत्कालीन खासदार हरीलाल पटवारी यांचे आकाली निधन झाले आणि व नवीन लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी तेथे पोटनिवडणूक लागली नी मग झाला आसाम जन आंदोलन चा जन्म , त्यात झाले असे की १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्राम युध्दामुळे मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक आसामात स्थलांतरित (घुसखोर )झाले त्यात मुख्यत बंगाली भाषिक मुस्लिम , आणि ह्या स्थलांतरांची ( घुसखोरांची ) मग नावे स्थानिक मतदार याद्या मध्ये नोंदविली गेली होती परिणाम मूळ आसामी जनतेने त्या विरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि त्यातून सुरु झाले आसूचे (ऑल आसाम स्टुडंट्स युनियन ) आंदोलन मागणी होती की विदेशी घुसखोरांची नावे मतदार याद्यातून काढल्याशिवाय आसाम मध्ये पुढील निवडणुका घेऊ नये ,पण भारतीय कोण आणि बांगलादेशी घुसखोर कोण हे ठरवायचे कसे आणि स्थलांतरित कोणत्या वर्षी भारतात आला त्याचे आधारभूत वर्षे कोणते घ्यायचे १९५१ की १९७१ यासारखे यक्ष प्रश्न होतेच परंतु आसू ची मुख्य मागणीच होती ह्या सर्व घुसखोरांना आसाम बाहेर घालवल्याशिवाय निवडणुकांचं घेऊ नये सकृतदर्शनी हे आंदोलन विद्यार्थ्यांनी गांधीजी च्या विचारसरणी नुसार शांततेच्या मार्गाने चालवलेले आंदोलन होते पण जसा जसा काळ पुढे जात गेला तसे आंदोलनाला वेगवेगळ्या दिशा येत गेल्या उल्फा (युनाइटेड लिब्रेशन फ्रंट ऑफ आसाम ) चा जन्म झाला उल्फा ही अतिरेकी संघटनाच होती . बोडोलँड ची मागणी ,उदयाचल ची मागणी ,आसूंचे रूपांतर आसाम गणो परिषद या पक्षात झालेले रूपांतर आणि स्वतंत्र्य भारताच्या इतिहासात कधी न घडलेली घटना म्हणजे महाविद्यालयाच्या वसतिगृहातून विध्यार्थी  सरळ राज्याच्या मंत्रीपदी , मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. श्री .प्रफुल्ल महंतो हे वयाच्या ३३ व्या वर्षी  देशातील कोणत्याही संपूर्ण राज्याचे (केंद्रशासित प्रदेशाबाबत वेगळे रेकॉर्ड आहे ) सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. या आणि बऱ्याच राजकीय घडामोडीचा लेखिकेने बिबीसी (ब्रिटिश ब्रॉडकॉस्टिंग कॉर्पोरेशन ),ब्लिटीझ या सारख्या प्रथितयश माध्यमाच्या प्रतिनिधी म्ह्णून मागोवा घेतला या आंदोलनाची दुसरी बाजूही जगासमोर आणणाऱ्या बातम्या दिल्या त्यात नेल्लि येथील नृशंस हत्याकांड स्टुडंट्स टर्न राज्याचे मंत्री मुख्यमंत्री झालेल्या नेत्यांचे वागणे,१९८५ च्या आसाम करारांचे पुढे काय झाले ,खरोखरच आसाम घुसखोर मुक्त झाला का यासारख्या बऱ्याच गोष्टीची या पुस्तकातून माहिती मिळते .

ज्याप्रमाणे ब्रम्हपुत्रेतील माजुली बेटे ब्रम्हपुत्रेच्या प्रवाहाचे दोन प्रवाहात करतात त्याच प्रमाणे लेखिकेचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य हे देखील दोन वेगळे प्रवाहच जरी  लेखिका आणि त्यांचे यजमान यांचा प्रेम विवाह होता तरी देखील त्यांना संसार करण्यासाठी ,मुलीच्या शिक्षणासाठी बराच संघर्ष करावा लागला, कारण त्यांचे यजमान दुभंगलेली मनोस्थितिने (स्चीझोफ्रेनियाने ) ग्रस्त होते.हा सर्व विरोधाभास असून देखील लेखिकेने कश्या प्रकारे ह्या सर्व गोष्टी चा सामना केला त्यांच्या एक शिक्षिका ते पूर्वोत्तर भारतातील आंतरराष्ट्रीय माध्यमाचे प्रथम महिला पत्रकार या पर्यंतचा प्रवास म्हणजेच मन गंगेच्या काठावर .

पुस्तक कोणी वाचावे

१. ज्यांना  एन आर सी  (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन ),कॅब (सिटीझन शिप  अमेंडमेंट  बिल) ,सी ए ए (सिटीझन शिप अमेंडमेंट ऍक्ट ) चे मूळ काय आहे हे आणि त्याची आसामात का सुरवात झालीहे  जाणून घ्यायचे आहे त्यांनी   

२. बांगलादेशी घुसखोरीची समस्या काय आहे आणि तिचे आसाम शी नाते काय  

३.बोडोलँड ची मागणी काय आहे

४.आणि व्यक्तिगत आयुष्यात हरलेल्याची भावना मनात निर्माण झालेली आहे अश्या सर्वानी

हे पुस्तक जरूर वाचावे.

Rajhans Prakashan

#RajhansPrakashan

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...