Saturday, November 26, 2022

अंतर्यामी खजुराहो


 अंतर्यामी खजुराहो

ऐतिहासिक कादंबऱ्या वगळता,कादंबरी,कथा आणिकविता संग्रह हासाहित्य प्रकार आजपर्यंत मी जे काही थोडं फार वाचतो त्या वाचन सवयीतून दुर्लक्षित असलेला किंवा कटाक्षाने टाळलेला साहित्य प्रकार होता .अगदी शाळेत इसापनीतीच्या चातुर्य कथा- आणि बिरबल अकबराच्या कथा चे वाचन वगळता ,कथासंग्रह हा साहित्य प्रकार माझ्या वाचनात दुर्लक्षितच आहे. परंतु गेल्या एक दोन वर्षात वाचन करत असताना सातत्याने वाचनात कथासंग्रहआणि कादंबरींचे उल्लेख हे मला ठळकपण जाणवू लागले व त्यामुळे कै.भाऊ पाध्ये व कै.जयंत पवार यांच्या लिखाणाशी थोड्याफार प्रमाणात ओळख झाली . किंबहुना म्हणूनच मी चरित्र ,आत्मचरित्र ह्या वास्तववादी साहित्य प्रकाराकडून कथा, कादंबरी सारख्या लेखकाच्या प्रचंड अश्या कल्पनाशक्ती व सृजनातून निर्मिलेला साहित्य प्रकार प्रयत्नपूर्वक वाचतोय.
अशाच कादंबऱ्या धुंडाळताना मला गोपाळ आजगावकर यांची अंतर्यामी खजुराहो ही कादंबरीअगदी अनपेक्षित रित्या गवसली . मुळात वाचन करताना मी बहुतांश वेळा ते उद्देश ठेवून वाचत असतो आणि वाचनाचे विषय हे कामगार आणि औद्योगिकक्षेत्रा संबंधित जास्त असतात . त्यामुळे जेव्हा ह्या कादंबरी संबधी माहिती वाचताना मुंबईतील गिरणीकामगाराचा संप हा शब्द दिसताच विकत घेतली आणि अधाश्या सारखी वाचून काढली.
मुळात मानवी मन हे भूतकाळात जास्त रमते त्यामुळेच आजकाल आपण सर्व गोष्टी ह्या रेट्रो (retro ) स्वरुपाच्या शोधत असतो .म्हणूनच आजकाल कपडेलत्ते,राहणीमान किंवा वाहनाच्या डिझाइन (Design ) ही ह्या परत ६०-७० च्या दशकाकडे पुन्हा एकदा झुकू लागल्या आहेत. History is cyclical असा वैचारिक प्रवाद देखील आहे.
प्रा. हरिश्चंद्र थोरात यांनी ब्लर्बमध्ये कादंबरीची प्रशंसा करताना लिहले आहे की “गोपाळ आजगांवकर यांच्या या कादंबरीमधून सत्तरीच्या दशकातील महानगरीय सामाजिक-सांस्कृतिक विश्व प्रत्ययकारक रीतीने उभे राहते ”. मराठी सामाजिक कादंबरीतून ग्रामीण समाज जीवन आणि त्याचे चित्रण मोठया प्रमाणात लिहले गेले आहे परंतु ,महानगरीय समाजजीवनाच्या बाबतीत सामाजिक चित्रण हे फार थोड्या प्रमाणात आहे किंवा ते माझ्या वाचनात आलेले नाही . ती कमी अंतर्यामी खजुराहो ही कादंबरी भरून काढताना दिसते .
७०च्या दशकापासूनचा कालखंड हा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या बंडखोरीचा किंवा प्रस्थापितांपासून वेगळे अस्तित्व मांडणारा कालखंड मानला आणि ह्याच सत्तरीच्या दशकात नुकत्याच उदयास आलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या दासू ह्या नायकावर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा सामाजिक दृष्ट्या काय परिणाम होतो याचे विवेचन लेखकाने ताकतीने केले आहे .
कादंबरी येणारे स्त्री पुरुष यांच्यातील शरीर संबंध ,स्त्री पुरुष जनेंद्रिया संबंधित येणारे वाकप्रचार,म्हणी ,गुप्त नावे किंवा नायकाने स्वतःच्या लैंगिक भानाचा निचरा करताना वापरलेले वाकप्रचार आणि ह्याच लैंगिक संबंधाच्या बाबतीत नायकाचे नैतिकता आणि अनैतिकतेच्या व्याख्या विषयी चालणाऱ्या विचारांचे चित्रण वाचून कादंबरी अश्लीलतेकडे झुकते की काय असे बऱ्याचदा वाटते.
अगदी ह्या नैतिकता आणि अनैतिकतेच्या व्याख्या विषयी वैचारिक हिंदोळे घेत असताना नायकाच्या मनातून मन आणि शरीर या बद्दल एक विचार करायला भाग पाडणारा स्वसंवाद अगदी सहजच येतो "मन आणि शरीर यांच्यात मोठा फरक आहे. मनाने काहीही केलं तरी चालतं . ते दडून राहत . त्याचा फारसा त्रास होत नाही . पण शरीराने काही केलं की ते कर्म होतं आणि ते आयुष्यभर आपणाला चिटकून राहते".हा विचार अगदी झटकन वर्तमानात आणून सॊडतो कारण आपण देखील कदाचित आपल्या कटुंबातून व सामाजिक जडणघडणीतून प्रत्येक शाररिक कृती ही नैतिकतेच्या आणि अनैतिकतेच्या कसोटीवर ताडून बघत असतोच ना ?
नायकाच्या या मनोकायिक आख्यानाबरोबर ७०च्या दशकांत मुंबई महानगराच्या राजकीय पटलावर बजाव पुंगी हटाव लुंगी सारख्या तीक्ष्ण भाषिक आणि प्रांतीय विभाजनाच्या जाणीवा असणाऱ्या हिंद सेना नामक संघटनेचा उगम आणि वाटचाल ही तेवढ्याच ताकतीने कादंबरीत मांडण्यात आलेली आहे.ह्या हिंद सेनेच्या वाढत जाणाऱ्या शाखा व त्या गिरण कामगारांच्या मुलाचा सहभाग हा कुठेतरी प्रस्थापित डाव्या पक्षांचा बिमोड करून क्षीण होत चाललेल्या डाव्या संघटनांची जागा घेताना दिसतो.
मानवी मन राजकीय विचार करताना , शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शरीर सुखातून समाधान मिळवण्यासाठी सातत्याने- संधी शोधात राहते व कृती करण्याअगोदर हे विचार नैतिक अनैतिकतेच्या चौकटीतून मनातल्या मनात तावून सुलाखून ही घेते पण कृती करताना स्खलन पावते . मग ह्या स्खलनातून येणारे सुखाचा आस्वाद घेण्या बरोबरच शारीरिक कृती पाप पुण्याच्या कसोटीत मोजत बसते याचा प्रत्यय कादंबरी वाचताना सातत्याने येतो .
कादंबरीच्या नावाची फोड करून जर शब्दश अर्थ काढल्यास अंतर्यामी म्हणजे मनात आणि चंदेल राजांनी बांधलेले खजुराहो येथील वास्तू शिल्प हे कश्यासाठी प्रसिद्ध आहेत रसिक वाचकास सांगण्याची गरज नाही .
त्यामुळे वर वर कितीही सोज्वळतेचा आव आणला तरीही प्रत्येकाच्या मनात खजुराहो हे आकार घेतच राहते!!

No comments:

Post a Comment

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...