Sunday, May 29, 2022

शितू


 

शितू गो नी दांडेकर

आजकाल व्हॉट्स ॲप विद्यापीठात एक विनोद फिरत कायम असतो की तुम्ही आज काही नाही केले तर उद्या उतारवयात काय सांगणार .ह्या विनोदाच्या अनुषंगाने माझ्या शालेय जीवनात बालभारतीच्या अभ्यासक्रमातील पहिली पासून ते आठवी पर्यंत प्रत्येक वर्षी ,एक ना एक पद्य किंवा गद्य (धडा वा कविता) ह्या आयुष्यभर पुरतील अश्या आठवणी देऊन गेल्या आहेत .

१९९० च्या आधी जन्माला आलेली पिढी ही बऱ्याच बाबतीत नशीबवान होती कारण इंटरनेट , आभासी समाज माध्यमे ही त्यांच्या जीवनात नव्हती . त्यामुळे  मैदानी खेळ,वाचन , मामांचे गाव किंवा शाळेतून मिळालेले सुट्टीचा गृहपाठ हे त्यांचे सुट्ट्या मधील हँगिंग स्पेसस होत्या आणि आजच्या सारखी मुलं आणि मुली यांच्या तील संवादा मध्ये मोकळीक नव्हती आणि जे बिनधास्त मुले मुली सोबत फिरत वा संवाद साधत ते थोर क्रांतिकारक असतं आणि उरलेली समस्त जनता ही त्यांच्या पुस्तकातील पात्रासोबत रोमान्स करत असत.

ह्या उमलत्या वयातील काही धडे आजही अगदी लख्ख आठवतात मग तो तिसऱ्या इयत्तेत बालभारतीच्या पुस्तकातील खोडकर, बेदरकार आणि तितकाच संवेदनशील असलेला झेल्या असेल ( आजही तो झेल्या मनाच्या कोपऱ्यात जागा अडवून बसला आहे ) किंवा सातव्या इयत्तेतील शितू  ..

सातवीच्या बालभारतीच्या पुस्तकात भेटलेल्या शितूचे काल ओघात विस्मरण झाले होते पण धडयाच्या काही ओळी अश्या होत्या

हातातून रक्त वाहणारी शितू अंगणाच्या पायऱ्या उतरताना पाहिली ,तसं घाबरून हिच्या कडे धावत ते म्हणाले ,

"काय केलेस पोरी ? विसू कुठं आहे ? हातात छर्रे घुसले की -"

तिच्या पाठोपाठ विसू पायऱ्या उतरत होता . सगळं सांगण्याच्या अवसानात पुढे झाला तोच शितू म्हणाली ,

"नाही हुप्प्याने हात फोडला ! "

ह्या वाक्याने कदाचित  २०-२२ वर्षेनंतर ही शितूच्या आठवणी मनात ताज्या होत्या आणि निमित्त झाले स्टोरी टेल ॲपचे अचानक पुन्हा एकदा शितू ही ऑडियो बुकच्या रूपाने भेटली एका दमात आप्पांचे (गो नी  दां   चें) शितू आणि पवना काठाचा धोंडी ही दोन पुस्तके ऐकून संपवलीत .एकूणच पुस्तक ऐकणे हा माझ्या साठी नवीन प्रकार होता,पण का कोण जाणे जास्त रुचला नाही ,पुस्तक ऐकणे हे दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार आहे. म्हणून शेवटी पुन्हा एकदा पुस्तक आणून वाचले तेव्हा कुठं जीवात जीव आला आणि मनाला समाधान लाभलं.

शितू ही तशी छोटेखानी कथा कादंबरी आहे  एका कोकणी कन्येची की दूर्दैवाने जिच्यावर अगदी बालपणात दोन वेळा वैधत्व आले लागोपाठ दोन नवऱ्याच्या मृत्यूमुळे तिला समाजाने पांढऱ्या पायची ठरवली गेली .पण ह्याच कोकणकन्येला वेळशीच्या अप्पा खोत यांनी आश्रयच दिला नाही तर कुळवाड्याच्या ह्या कन्येवर सर्व ब्राह्मणी संस्कार पण घडवले . आप्पांच्या घरात शितू सोबत विसू हा आप्पांचा लहान पुत्र पण वाढत होता . विसूच्या जन्माच्या वेळी विसूची आई बाळंतपणात अप्पांना आणि विसू पोरकं करून सोडून गेली आणि जाता जाता अप्पांना

"जगायची इच्छा होती ;पण ती अपुरी राहिली . बाळाचं उण पडू देऊ नका मी वरून पाहत राहीन ." हे शब्द देऊन गेली

त्यामुळे अप्पांचा विसू वर खूप जीव आणि ह्यामुळेच आप्पांचा हा लहान मुलगा व्रात्य आणि खोडकर होता .त्यांच्या खोड्यांनी सारे गाव परेशान होते पण खोताचा पोरगा म्हणून गावकरी त्यांच्या कडे दुर्लक्ष्य करत ,विसू जरी व्रात्य आणि खोडकर होता तरी तो आप्पा खोताप्रमाणे प्रेमळ आणि दयाळू होता त्यामुळेच ज्यावेळी शितूचा जन्मदाता बाप तिला बालविधवा म्ह्णून मारायला निघतो त्यावेळी विसू तिला तिच्या बापाच्या तावडीतून सोडवतो .
 
एकाच वेळी सोशिक शितू आणि तितकाच व्रात्य खोडकर विसू अप्पांच्या घरात वाढत असताना त्यांच्यात प्रेमाचे व प्रीतीचे नाते बहरात जाते त्या नात्यात काही काळासाठी विरहही येतो आणि एका कठीण प्रसंगी शितूच एका दूर्दैवी घटनेच्या मानसिक आघातामुळे मोडून पडलेल्या विसूला आयुष्यात पुन्हा उभे राहण्यासाठी प्रवृत्त करते पण ह्या दोघांच्या तरल प्रेमात असे काही वादळ येते की शितू आणि विसू मध्ये बहरणारे प्रेम आणि प्रिती दुभंगून जाते .

काय होते ते वादळ ,कोणते मानसिक आघात विसू वर झालेत आणि विशेषतः पुन्हा एकदा आपले बालपण जगण्यासाठी  

गो नि दां नी भाषीय संस्कार करून वाचकांच्या हाती सोपवलेली स्वतःची अत्यंत लाडकी ,पण जन्मभर सोसावी लागलेली मानसकन्या शितू  "चित्ता अति हळुवारपण आनौनिया " वाचावी    . 

Thursday, April 28, 2022

मास्तरांची सावली


मास्तरांची सावली

जसा एच आर झालो तसा का कोण जाणे गिरणगाव, लालबाग परळ आणि तेथील गिरणी कामगार यांचा इतिहास याच्या प्रेमात पडलो. एच आर मधील आय आर आणि कामगार कायदे (औद्योगिक संबंध)हा माझा आवडता प्रांत आणि माझ्या समजुती प्रमाणे मुंबईतील कापड गिरण्याच्या नियमनासाठी कामगार कायदे आले .पुढे कामगारांनी त्यांच्या हक्कासाठी लढे उभे केल्या , कामगार संघटना , कामगार चळवळी उभ्या राहिल्या त्यामुळे आय आर ,कामगार कायदे मुळापासून समजून घेण्यासाठी मी सदैव त्या संबधित पुस्तकाच्या शोधत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून गुगल वर सदैव कामगार ,कामगार संघटना,कामगार कायदे कापड गिरण्या ,लालबाग परळ हे  शब्द टाकायचे आणि त्या संबंधीची पुस्तके, माहिती,डॉकमेन्ट्रीज  शोधत राहायच्या हा जणू दिनक्रमच झाला आहे .

एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शन मध्यंतरी  त्यांच्या मुलाखतीत बोलले होते की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. त्याच प्रमाणे  तत्कालीन साहित्य कविता ,गाणी ,कादंबऱ्या ,चरित्र ,आत्मचरित्रे ,चित्रपट ,नाटके  हे सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा इतिहास यातून डोकावत असतो . याच शोधात असतानां २०१७ ला कवी कै नारायण सुर्वे यांच्या कामगार आहे मी, तळपती तलवार आहे ह्या कवितेच्या खालील ओळी वाचण्यात आल्या

रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे,

तसा नारायण सुर्वे यांचे यांचे साहित्य न वाचता पण त्यांच्या डाव्या विचारसरणीशी असलेल्या बांधिलकी मुळे गिरण कामगार हा विषय वाचताना विविध ठिकाणी त्यांच्या  लिखाणाचा संदर्भ येत होता व त्या त्या वेळी तत्यांचे ते साहित्य वाचून संपवले पण त्यांच्या चरित्राचा शोध सुरुच होतो . २-३ वर्षांपूर्वी गूगल मंथनातून "मास्तरांची सावली "वर आले होते विकत घेऊन वाचायला मुहूर्त लागत नव्हता . शेवटी २०२२ च्या विश्व पुस्तक दिनी ते संग्रही आले आणि आल्या आल्या एका दमात संपवून टाकले.

मास्तरांची सावली हे कृष्णाबाई नारायण सुर्वे लिखित आत्मकथन हे कहाणी आहे किशा आणि तिच्या मास्तरांची .

किशा ही अशिक्षित, मंगलदास चाळीत राहणाऱ्या  मिल मध्ये काम करणाऱ्या कामगार दांपत्याची एकुलती एक मुलगी तिच्या समजुती प्रमाणे एके दिवशी कोणी तरी मूठ मारली आणि तिचे वडील हे जग सोडून गेले व वडिलांच्या पाठोपाठ इज्जतीला बट्टा लागू नये म्हणून आईने विषारी फळ खाऊन आत्महत्या केली. हे दोन्ही आघात किशाच्या न कळत्या वयात घडले की अगदी तिला तिच्या जन्मदात्याचे चेहरे पण आठवत नाहीत .ह्या अनाथ किशाचा सांभाळ तिच्या वडिलांच्या आई ने अगदी कष्टपूर्वक केला स्वतः  किशाने वयाच्या आठव्या वर्षापासून धुणी भांडी व मोलमजुरी करून आजी ला हातभार लावत होतीच .

अगदी ह्याच किशा सोबत तिचे मास्तर ही मंगलदास चाळीत वाढत होते . तिचे मास्तर म्हणजे गंगाराम सुर्वे ह्या वुलन मिल मध्ये काम करणाऱ्या मिल कामगाराने रस्त्यावरून उचलून आणलेले मुलगा जशी किशा वयाने वाढत होती तशी तिचे मास्तर हे ह्याच चाळीत वाढत . मास्तर म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते अगदी पूर्ण गिरणगाव  चळवळीचे पत्रके लावणे ,प्रौढ साक्षरता वर्ग घेणं ,सभेत भाषणे देणे अशी सर्व उद्योग मास्तर करत असत (त्या वेळी मास्तर फक्त तिसरी शिकले होते). अश्याच एका प्रौढ साक्षरता वर्गात किशाची आणि मास्तरांची भेट झाली आणि कालांतराने एकमेकांच्या प्रेमाचे बंध घट्ट होत गेले.

मास्तर हे रस्त्यावर सापडलेले पोर त्यामुळे त्याच्या जाती पातीचा काही ठाव ठिकाणा नव्हता आणि ही गोष्ट किशाच्या चुलत्यांना खटकायची आणि त्याच्या ह्या प्रेमाला विरोध होता . त्यामुळे एके दिवशी दोघांनी रजिस्टर पद्धतीने कोर्टात जाऊन विवाह उरकून टाकला त्यानंतर सुरु झाले दोघांच्या संसाराचे दशावतार कारण ह्या विवाहाला किशाच्या चुलत्यांचा विरोध ह्या चुलत्यांच्या भीती मुळे मास्तरांचे वडील आपली चाळीतील खोली सोडून गावाकडे निघून आणि लग्नाच्या पहिल्याच दिवशी दोघांच्या डोक्यावरचे छप्पर गेले आणि हे संसाराचे भोगभोगत आणि आलेल्या संकटाशी दोन हात करत कधी फूट पाथ वर,कधी झोपडीत तर कधी घाणीने बरबटलेल्या अंधाऱ्या चाळीत त्यांचा संसार उमलत पण गेला . 

त्या संकटाच्या काळात एका कम्युनिस्ट चळवळीतील शिक्षण विभागातील असणाऱ्या  एका महिला अधिकाऱ्यांना किशाला आणि मास्तरांना महानगर पालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून कामाला लावले व दोघांच्या आयुष्यात स्थिरता आणली पण दोघांच्या संसाराचा मार्ग हा काट्या कुट्यांनी भरलेला होता . दरम्यानच्या काळात त्यांच्या ह्या संसाररूपी वेलावर फुले ही उमलू लागली होती . पहिल्या अपत्यासोबत मास्तर सातवीची परीक्षा देऊन खरेखुरे शाळा मास्तर (शिक्षक )झाले .आणि उत्त्तरोउत्तर मास्तर एक साहित्यिक म्हणून नावा रुपाला आले की अगदी ते कुसुमाग्रजांचे मानस पुत्र झाले .

पण किशा चा संघर्ष काही संपला नाही उलट तो  उत्त्तरोउत्तर अगदी गडद होत गेला एका बाजूला शिपायांची नोकरी तर दुसऱ्या बाजूला घरात मुलांची व्यसनाधीनता आणि त्यात अगदी कमी वयात दोघे कर्त्या मुलांचे आणि सुनांच्या मृत्यू पचविण्याचे दुखत प्रसंग ही आले .ह्यात भर कमी कि काय तिचे जीवापाड प्रेम असणारे मास्तर ही तिला एकाकी सोडून गेले .

किशा तिच्या मास्तरांसाठी लिहते त्या प्रमाणे "शेवटी मृत्यू हा अटळच आहे, पण तो असा आजारीरुपात येऊ नये, आनंदात हसत हसत यावा. तुम्हांलाही आणि मलाही. म्हणूनच फक्त तुम्हांला ज्या गोष्टींत आनंद मिळतोय त्या गोष्टी मीही आनंदानं करीन. कारण मला पैसा, दौलत काहीच नकोय. फक्त माझ्या मास्तरांचं कर्तृत्व त्यांच्या मागेही समाजात राहावं, एवढीच माझी इच्छा आहे. बाकी मी तुमच्यासोबतच तुमची सावली म्हणूनच राहणार, आणि तुमचीही सावली माझ्यावर सतत राहू दे. बाकी मला काहीही नको."

कोण होती किशा कोण होते तीचे मास्तर आणि त्यांचे असे काय कर्तृत्व समाजात राहिले या सर्वासाठी जरूर वाचा "मास्तरांची सावली "
 

Sunday, September 19, 2021

भुरा- प्रा शरद बाविस्कर

 


भुरा- प्रा शरद बाविस्कर


उत्तर महाराष्ट्रातील मुख्यत्वे नाशिक जिल्ह्यातील काही तालुके, धुळे, नंदुरबार व जळगाव हे भौगोलिक क्षेत्र अहिराणी भाषिक भाग म्हणून ओळखला जातो .तसा हा भाग सर्व साधारण पणे पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा भाग आहे . त्यामुळे तापी ,गिरणा,पांझरा व कान नद्यांच्या काठाचा गावांचा व जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक तालुक्यांच्या अपवाद वगळता इतर भागात शेती ही सर्वस्वी निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे व शेतीचे उत्पन्न हे अत्यल्प असून कारखानदारी व औद्योगिकीकरण देखील कमी प्रमाणात आहेत . त्यामुळे खाजगी क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्याची संधी देखील नगण्य प्रमाणात आहेत, त्यामुळे उपजिविकेसाठी व जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही . कदाचित ह्या संघर्षाच्या वृत्तीमुळे अहिराणी भाषिक ( खान्देशी) व्यक्ती देशात व विदेशात विविध क्षेत्रात जबाबदारीच्या पदावर आज विराजमान आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे.


कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याबरोबर त्या पदापर्यंत पोहचण्याचा संघर्ष त्यात आलेल्या अडीअडचणी ,खाच खळगे ,अनिश्चितता यावर मात केलेला हा संघर्ष पूर्ण प्रवास हे इतर सहपथिकांना पथ दर्शक ठरतो तसेच भविष्यात येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्यास मार्ग दाखवू शकते . त्यामुळे हा संघर्ष शब्दबद्ध होणे हे फार महत्त्वाचे असते .

भुरा हे आत्मचरित्र ह्याच अहिराणी भाषिक भागातील धुळे जिल्ह्यातील रावेर ह्या छोट्याशा खेड्यातील भुरा प्रवास आहे प्रथम वाचनानंतर मला ढोबळमानाने लेखकांचा हा आत्मचरित्र प्रवास मुख्यतः खालील भागात विस्तारलेला दिसतो .

१. रावेर ता -धुळे ते धुळे


२. धुळे ते लखनौ


३. लखनौ ते दिल्ली ते जे एन यू फ्रेंच विभाग


४. दिल्ली ते युरोप


५. युरोप ते जे एन यु मधील फ़्रेंच विभागात युवा प्राध्यापक 

अगदी थोडक्यात मांडायचे झाले धुळे जिल्ह्यातील गाळण टेकड्या पासून ते उत्तर भारतात दक्षिण अरवलीच्या डोंगर रांगात (व्हाया आल्प्सच्या पर्वतरांगा) स्वतःला घट्ट रोवण्याचा हा प्रवास आहे. जरी वरकरणी बघितला तर प्रवास जगण्याच्या संघर्षात भौगोलिक स्थलांतराचा वाटत असेल तरी त्याला वर्ग संघर्षाची किनार आहे ,समाजशास्त्राचे पैलू आहे व सरते शेवटी तत्वज्ञानाचा व वैचारिक बैठकीचा पाया आहे.

हा सर्व वर्ग संघर्ष नाही रे पासून आहे रे पर्यंतच प्रवास हा सर्व वाचकांना तसेच गावांगावात निश्चल अवस्थेत पडलेल्या भुरांना प्रेरणा देईल आणि त्या सर्व भुरांचा प्रवास शरद पर्यंत होईल यात तिळमात्र शंका नाही

२०१३ मध्ये लोकसत्ता ह्या वृत्तपत्रात प्रत्येक शनिवारी राजधानीवर मराठी मोहोर नावाचे एक सदर यायचे . ह्या सदरात मूळचे महाराष्ट्राच्या विविध भागातील मराठी भाषिक असणारे परंतु कामाधंद्यानिमित्त भारताच्या राजधानीत स्तिरावलेल्या यशस्वी व्यक्तिमत्त्वांचा प्रवास मांडला होता . यात महाराष्ट्राच्या विविध भागातील व्यक्तीमत्वात लोकसत्ताने माझ्या स्मृती प्रमाणे २ खानदेशीय व्यक्त्तींची लोकसत्ताने दखल घेतली होती एक होते पदमभूषण श्री राम सुतार (प्रसिद्ध शिल्पकार ) व दुसऱ्या होत्या श्रीमती अमिता बाविस्कर (लेखिका व प्राध्यापक पर्यावरण ,समाज शास्त्र व मानववंश शास्त्र विभाग ,दिल्ली विद्यापीठ).


आता किंवा येणाऱ्या भविष्यात किंवा कोणी जर अश्या महाराष्ट्रातून भारताच्या राजधानीत स्थलांतरित झालेल्या महाराष्ट्रातील यशस्वी व्यक्तीमत्त्वांचा इतिहास मांडेल त्यावेळी मला विश्वास आहे की तो इतिहास ह्या भूराची (प्रा शरद बाविस्कर ) यांची दखल घेतल्याशिवाय पूर्ण होऊच शकणार नाही.


लिखाणाच्या ओघात पुस्तकात बऱ्याच ठिकाणी काही इंग्लिश व फ्रेंच शब्द आणि वाक्ये आली आहेत तरी त्यांचे सर्व सामान्य वाचकाच्या सोयीसाठी मराठीत भाषांतर पुढील आवृत्तीत उपलब्ध करून द्यावे . या व्यतिरिक्त भुरा हे प्रा.श्री.शरद बाविस्कर यांचे आत्मचरित्र असले तरी त्यात त्याच्या वेगळ्या धाटणीच्या व्यवसायिक कारकिर्दीचा प्रवास आहे . त्यामुळे त्यांच्या पदव्या व त्या पदव्या कोणत्या संस्थातून मिळवल्या यांच्या बद्दल देखील माहिती देण्यात यावी त्यामुळे भुरा हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक करिअर गाईड म्हणून त्यांच्या भविष्याचा निर्णय घेण्यास सहाय्यक ठरेल.  

म्हणूनच सर्वांनी गावातील कच्ची वडांग पासून ते झिजीन मरानं ,पण थिजीन नहीं मरानं ह्या जीवनाचा संदेश देणारे भुरा हे आत्मचरित्र जरूर वाचावे .  



Saturday, September 4, 2021

द लव्हर बॉय ऑफ बहवालपूर


 लव्हर बॉय ऑफ बहवालपूर   -राहुल पंडिता 

 

"गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त"  अमिर खुसरो च्या या पंक्ती वाचल्या तर एव्हाना सर्वांना भारतातील नव्हे जगातील स्वर्ग असणाऱ्या जम्मू काश्मिर ची आठवण जरूर झाली असणार ,पण भारताचे हे नंदनवन खरोखरच नंदनवन आहे की शापित नंदनवन आहे.

हे नंदनवन का शापित आहे त्याची कारण मीमांसा विविध अंगाने होऊ शकते . पण आजच्या पुस्तकाचा विषय काश्मिरात कायम अशांतता माजवण्यासाठी अहोरात्र चालविण्यात येणारे अतिरेकी कारवाया पैकीच २०१९ साली लेथपुरा (Lethpora) जिल्हा पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ( सि आर पी एफ ) वाहन ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची कहाणी आहे .

१९९० नंतर काश्मिरात अतिरेकी कारवायात लक्षणीय वाढ झाली त्याचा परिणाम म्हणून काश्मिर खोऱ्यातील  पंडित (काश्मीर खोरे -ज्यात १० जिल्हे आणि १५००० चौ किमी भूभाग येतो ) हे विस्थापित झाले . त्या काळात जे काही काश्मिरी पंडितांचे स्थलांतरण झाले ते कलाशिकानोव्हच्या (एके -४७ रायफली ) जोरावर घडवून आणण्यात आलेले . त्या काळात अतिरेकी कारवायांनी अगदी कळस गाठला होता भारताच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कन्येचे देखील ह्या अतिरेक्यांनी अपहरण केले होते . परंतु तदनंतर गेल्या  दशकांत काश्मिरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले .भारतीय भूमीवर काही राज्याच्या अपवाद वगळता बऱ्याच राज्यात देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न भूतकाळात होते आणि  काही राज्यात अजूनही आहेत त्यात बऱ्याच आंतरराष्ट्रीय शक्ती , शेजारील शत्रू राष्ट्रे सहभागी आहेत आणि त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे.अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानात बऱ्याच प्रकारचे (मानवी बॉम्ब , कार बॉम्ब .) आत्मघातकी हल्ले भूतकाळात झालेत .या आत्मघातकी अतिरेकी हल्ल्यात भारताच्या माजी पंतप्रधानांना पण त्यांचे प्राण गमवावे लागले .

तसा जम्मू काश्मिरात आत्मघातकी हल्ला हा प्रकार नवीन नाही किंबहुना २०१९ चा पुलवामा हल्ला घडण्याच्या अगोदर असे हल्ले झालेच नाहीत असेही नाही .२००१ मध्ये जैश  मोहंमद ह्या अतिरेकी संघटनने श्रीनगर मध्ये जम्मू काश्मीर च्या जुन्या विधान भवनावर स्फोटकांनी भरलेली सुमो कार द्वारे मोठा आत्मघातकी हल्ला घडवला होता . त्यात ३८ नागरिक मृत पावली होती . त्या हल्ल्याचे मास्टर माईंड तसेच हल्लेखोर हे पाकिस्तानी नागरिक होते .

लेखकाच्या पुस्तकातील निवेदनाप्रमाणे काश्मीरी व्यक्ती तसा खूप धाडसी वा आक्रमक नसतो . कारण पुलवामा हल्ल्यात हल्लेखोर वाचण्याची काडी मात्र शंका नव्हती . पण पुलवामा हल्ल्याच्या हल्लेखोर (ज्याने प्रत्यक्ष स्फोटकांनी भरलेली कार सी आर पी एफ च्या ताफ्याला जावून धडकवली ) हा भारतीय होता . .

१९८९-९० च्या अतिरेकी कारवाया पराकोटीला पोहचल्या होत्या बऱ्याच जणांना काश्मीर हा भारताच्या ताब्यातून जाणार ही शक्यता वाटायला लागली होती . त्याच स्वरूपाचे काहीशी अनिश्चितता ही काश्मीर खोऱ्यात २०१६ च्या जुलै महिन्यात आली होती . इंटरनेट वरील समाज माध्यमे (फेसबुकयुट्युब ,  इतरभारतातील इतर भागात रुजून तरुणाई ला आकर्षित करत होती आणि  तरुणाईचे  आयडॉल या माध्यमातून निर्माण व्हायला लागली होती . अनियमित  विस्कळीत इंटरनेट सेवा असून पण काश्मिर ची तरुणाई ही यात कोठेही मागे नव्हती . काश्मीरी अतिरेक्यांच्या पटलावर बुरहान वानी ह्या हिजबुल मुजाहिद्दीन ह्या अतिरेकी संघटनेच्या नवीन तरुण अतिरेक्यांचा उदय होत होता आणि त्याची मोडस ओपरेंडी ही परंपरागत अतिरेक्यापेक्षा काहीशी वेगळी होती.त्याने समाज माध्यम तून (फेसबुक   युट्युब द्वारे  ) प्रसिध्दी मिळवायला सुरुवात केली होती आणि त्याचा एक फॅन फॉलोवर वर्ग काश्मीर खोऱ्यात तयार झाला होता.  त्या प्रसिद्धीच्या परमोच बिंदू वर असताना ०८-जुलै -२०१६ ला तो एका लष्करी कारवाईत मारला गेला . त्या नंतर काश्मिरात हिंसेचा एक आग डोंब उमळला होता .लष्करी पथके ,अर्धसैनिक दले यांच्या वरील दगडफेकी च्या कारवायात लक्षणीय वाढ झाली होती . तदनंतरच्या हिंसाचारात १०० हून अधिक माणसे मृत्यू मुखी पडली तर १५००० माणसे जखमी झाली होती .

बुऱ्हान वानी च्या खात्म्यानंतर काश्मिरात आत्मघातकी हल्ल्याच्या घटना ह्या घडतंच होत्या मधल्या काळात उरी हल्ला आणि त्याचे प्रतिउत्तर ही भारतीय संरक्षक दलांनी दिले होते . उरी हल्ल्याच्या सर्जिकल स्ट्राइकवर अगदी सिनेमा पण येउन गेला होता . परंतु २०१९ चा सी आर पी एफ च्या ताफ्यावर जो आत्मघातकी हल्ला झाला तो इतका भयंकर आणि भीषण होता की अगदी ४० जवानाच्या शरीराच्या चिंध्या झाल्या होत्या आणि अवयव हे घटनेच्या संपूर्ण परिसरात विखुरले गेले होते . ज्या वाहनात स्फोटके भरून धडकवण्यात आले होते ते वाहन अगदी चक्काचूर झाले  त्यामुळे ह्या हल्लयांचे गूढ उकलने हे एनआयए ह्या तपास यंत्रणे समोरील एक मोठे आव्हान होते .

वरील सर्व आव्हान तपास यंत्रणेनं कसे पेललेले एनआयए चे कोण निष्णात अधिकारी होते की ज्यांनी घटनास्थळापासून काही अंतरावर मिळलेल्या एका किल्ली आणि अंगठ्याच्या साह्याने ह्या सर्व हल्ल्याचे गूढ उकलून काढलेप्रस्तुत पुस्तक अगदी आपणास गाझी बाबा (२००१ साली भारतीय ससंद भवनावर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड ) याचा संरक्षक दलांनी कसा खात्मा केलाश्रीनगर मध्ये अतिरेक्यांना लपण्यासाठी कश्याप्रकारची भूलभुलैया रचना असणारी घरा अंतर्गत  गुप्त रचना असलेल्या जागा निर्माण केल्या जातात . याउपर वरील सर्व हल्ल्यासाठी आत्मघातकी हल्ल्यासाठी हल्लेखोरांची निवड कशी करण्यात आली . ह्या सर्व हल्ल्याच्या घटनेत वापरण्यात आलेला मोबाइल फोन हा ह्या हल्ल्याच्या ऑपेरेटरचे आदेश असूनही नष्ट करण्यात आला नाही  आणि तो मोबाइल संच तपास यंत्रणेला कसा मिळाला आणि त्यात तपास यंत्रणांना काय मिळाले,सर्व भारतीयाचा आवडता असा चर्चेचा मुद्दा बालाकोट सर्जिकल स्ट्राइक (ज्या वरून नंतर बरेच राजकारण ही रंगले ) ह्या आणि अजून सर्व तपशीलासाठी प्रस्तुत पुस्तक वाचणे हे जरुरीचे आहे .

 

हे पुस्तक २०१९ च्या सी आर पी एफ दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचे आणि तदनंतरच्या तपासाचे तसेच हल्ल्याच्या पार्श्वभूमीचे  त्या संबंधीच्या घटनांच्या बाबतीत एक निश्चित महत्वपूर्ण दस्तऐवज आहे यात काडी मात्र शंका नाही आणि असायचे काही कारण ही नाही . परंतु ह्या वेळी पुस्तक परिचय लिहिण्याच्या अगोदर मी पुस्तकाच्या लेखकाच्या बऱ्याच मुलाखती मी विविध समाज माध्यमात ऐकल्यात त्याच मुलाखतीतील एक स्मरणीय मुलाखत ही  वायर ह्या वाहिनीचे पत्रकार श्री करण थापर यांनी घेतलेली मुलाखत त्यांच्या ह्या पुस्तकाबद्दलच्या केलेल्या खालील विधानामुळे जास्त स्मरणात राहिली

Pandita has an incredible story to tell which some may find hard to believe. Others may be sceptical [...] But there will also be many who will accept Pandita’s detailed story

वरील करण थापर यांच्या विधानाचा स्वैर मराठी अनुवाद

पंडिताची (राहुल पंडितांची ) एक अविश्वसनीय कथा आहे ज्यावर काहींना विश्वास ठेवणे कठीण वाटेलइतरांना शंका असू शकते [...] पण असे बरेच लोक असतील जे पंडितांची तपशीलवार कथा स्वीकारतील 

राहुल पंडिता हे मुक्त पत्रकार असून त्यांचे हॅलो बस्तर (नक्षलवाद ) ,आवर मून हॅज ब्लड क्लाट्स (काश्मीर आणि काश्मिरी पंडित ) ही पुस्तके देखील वाचनीय आहे
  


 

एम्प्लॉयी रेलेशन्स डेमिस्टीफाइड रिअल लाइफ एक्सपेरियन्सस - जेकब वर्गीस

एम्प्लॉयी रेलेशन्स डेमिस्टीफाइड रिअल लाइफ एक्सपेरियन्सस - जेकब वर्गीस उद्योग धंदा (कारखाना व आस्थापना ) हे विविध विभागांच्या एकत्रित प्रयत्न...